शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मालकांना परत केले
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

शिरूर, पुणे: शिरूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करून मूळ मालकांना परत केले आहेत. या कामगिरीबद्दल शिरूर पोलिसांचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
प्रकरण १: शिरूर बस स्थानकातील चोरी
दिनांक ११ मे २०२५ रोजी शिरूर बस स्थानकाजवळून रुपाली अनिल काळे (वय ४०, रा. त्रिमुर्तीनगर, भिगवन रोड, जळोची, बारामती) यांचे रु. ३,९०,०००/- किमतीचे ६.१ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरीला गेले होते. या प्रकरणी मनीषा विजय कसबे (वय ४०, रा. संजयनगर, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) आणि शोभा शंकर दामोदर (वय ३०, रा. संजयनगर, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) या दोन आरोपींना शिरूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेले गंठण हस्तगत करण्यात आले. या संदर्भात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ३१७/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरण २: हॉटेल श्रेयश जवळील चोरी
दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २:०० वाजताच्या सुमारास शिरूर येथील सुरजनगर, हॉटेल श्रेयश शेजारील पुलावर, जुने पुणे-शिरूर हायवे रोडवर, हॉटेल जोगेश्वरी समोर छबुबाई नारायण बनसोडे (रा. पाचर्णेमळा, शिरूर) यांच्याकडील अंदाजे रु. १८,०००/- किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि अंदाजे रु. ६०,०००/- किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील फुल वेलसह असे दागिने चोरीला गेले होते. आरोपींनी छबुबाईंना “आजी” म्हणून बोलवून बोलण्यात गुंतवून दिशाभूल केली होती. या प्रकरणी हरी गंगाराम बावरी राठोड, सुरज हसमुखभाई राजपूत, राहुल हसमुखभाई राजपूत, गौरांग चंद्रकांत पटेल (सर्व रा. गुजरात) आणि बबलू बिरचंद सोलंकी (रा. नागपूर, महाराष्ट्र) या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून वरील सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. या संदर्भात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ९६५/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दागिने परत केले
वर नमूद केलेल्या दोन्ही गुन्ह्यांमधील हस्तगत केलेला सोन्याचा मुद्देमाल आज, २४ जून २०२५ रोजी मा. कोर्टाच्या आदेशाने फिर्यादी रुपाली अनिल काळे आणि छबुबाई नारायण बनसोडे यांना पोलीस निरीक्षक, संदेश केंजळे यांच्या हस्ते परत करण्यात आला.
या कामगिरीचे श्रेय पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि पोलीस हवालदार बापू मांगडे यांना देण्यात आले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे फिर्यादी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.