शिरूर, २२ ऑगस्ट २०२५ – शिरूर पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलचा तपास करून एक मोठी कामगिरी बजावली आहे. सुमारे १५ लाख रुपये किमतीचे एकूण ५५ मोबाईल फोन शोधून काढून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने केली.
गेल्या काही महिन्यांपासून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये हरवलेल्या मोबाईल फोनबद्दल अनेक तक्रारी दाखल आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी एक विशेष तपास पथक तयार केले. या पथकाने मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करत त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले.
तपासादरम्यान, या पथकाला कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील विविध जिल्ह्यांमधून ५५ मोबाईल फोन शोधून काढण्यात यश आले. विशेषतः कर्नाटक राज्यातील हवेरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस अंमलदार हनुमंता जनागेरी यांनी या तपासात महत्त्वाची मदत केली.
आज, २२ ऑक्टोबर रोजी, या सर्व ५५ मोबाईल फोनला पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि शिरूर पोलिसांचे आभार मानले.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नारायण जगताप, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, नीरज पिसाळ, सचिन भोई, पवन तावडे, निखील रावळ, अजय पाटील, रविंद्र आव्हाड यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
शिरूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे हरवलेल्या मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला असून, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. आतापर्यंत शिरूर पोलिसांनी हरवलेल्या एकूण १२५ मोबाईल फोनचा शोध घेऊन ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत.
निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.